Skip to main content

Posts

Showing posts from April, 2009

कुणीतरी आठवण काढतयं...

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून बोलता बोलता शब्द ओठी जतीलही विरुन कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही कुणीतरी आठवण काढतयं, बाकी काही नाही मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे बोलण्याआधी आवाजाला , सांभाळावे थोडे सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही "कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही !

श्रावणमासी हर्ष मानसी ...

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे! वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे; मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे! झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तो उघडे; तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे! उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा! सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा! बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते! फडफडा करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती; सुंदरा हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती! खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे! सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला पारीजातही बघता भामारोष भामारोष मनीचा मावळला! सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदरबाला या फुलमाला रम्य फुले, पत्री खुडती! देवदर्शना निघती ललना, हर्ष माझ्या ह्रदयात! वदनी त्याच्या वाचुन घ्यावे श्रावण महिन्याचे गीत! :  बालकवी 

ती

ती एकदा आजीला म्हणाली मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं? आपली माणसं सोडून तीनेच का परकं घर आपलं मानायचं? तिच्याकडून का अपेक्षा जुनं अस्तित्व विसरायची? तीच्यावरच का जबरदस्ती नवीन नाव वापरायची? आजी म्हणाली अगं वेडे हा तर सृष्टीचा नियम आहे, नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून... तो येतो का कधीतरी तिच्याकडे आपली वाट मोडून, तीचं पाणी किती गोड तरीही ती सागराच्या खारट पाण्यात मिसळते आपलं अस्तित्व सोडून ती त्याचीच बनून जाते... एकदा सागर विलीन झाल्यावर तीही सागरच तर होते, पण म्हणून नेहमी तिच्यापुढेच नतमस्तक होतात लोकं... पापं धुवायला समुद्रात नाही गंगेतच जातात लोकं...!!

मागु नको सख्या, जे माझे न राहिलेले ...

मागु नको सख्या, जे माझे न राहिलेले ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहिलेले   स्वप्नातल्या करांनी, स्वप्नातल्या तुला मी होते न सांग कारे, सर्वस्व वाहिलेले स्वप्नात वाहिलेले, म्हणुनी कसे असत्य स्वप्नात सत्य असते, सामील जाहलेले स्वप्नातल्या कळीला, स्वप्नात फक्त पख दिवसास पाय पंगु, अन हात शापिलेले स्वप्नातल्या कळीला, स्वप्नात घेवुनी जा हे नेत्र घेवुनी जा, स्वप्नात नाहलेले जा नेत्र घेवुनी जा, स्वप्नांध आंधळीचे आता पहावयाचे, काही न राहीलेले : विं दा करंदीकर 

मातीचे मम अधुरे जीवन...

रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन कोसळताना वर्षा अविरत स्नानसमाधी मध्ये डुबावे दवांत भिजल्या प्राजक्तापरि ओल्या शरदामधी निथळावे हेमंताचा ओढुन शेला हळूच ओले अंग टिपावे वसंतातले फुलाफुलांचे छापिल उंची पातळ ल्यावे ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कचभार तिच्यावर गर्द वीजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे उभे राहुनी असे अधांतरी तुजला ध्यावे, तुजला ध्यावे : इंदिरा संत

मेघ...

मेघ दाटले कोठून नकळे मनभर आल्या धारा उत्कट ओल्या आठवणींचा झरे अनावर पारा खोल हृदयातळि साठून होते काहीसे सुकलेले खळखळणा-या ओघातुन ते खिदळत खेळत आले क्षितिजावरच्या निळ्या टेकड्या बालमैत्रीणी झाल्या हात धुक्याचे पुढे पसरूनी मिठीत मिटाया आल्या अवतीभवती भरून राहीला जुना अनामीक वास चमचमणा-या तिमिरालाही फुटले अद्भूत भास दहा दिशांतून वोळून आले गतजन्माचे पाणी लहरींवरती उमटत गेली अशब्द सुंदर गाणी दिन जे गेले, त्यांचे झाले गहनगूढ आभाळ बगळे होऊन झुलू लागली शुभ्र क्षणांची माळ : शांता शेळके 

मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे...

काटा रुते कुणाला,आक्रंदतात कोणी मज फूल ही रुतावे हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची चिर-दाह वेदनेचा मज शाप हाच आहे काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलणेही विपरीत होत आहे हा स्नेह वंचना की काहीच आकळेना? आयुष्य ओघळोनी मी रिक्त-हस्त आहे : शांता शेळके 

जिना ...

कळलें आता घराघरांतुन नागमोडिचा जिना कशाला एक लाडकें नांव ठेवुनी हळूच जवळी ओढायाला जिना असावा अरुंद थोडा चढण असावी अंमळ अवघड कळूनही नच जिथे कळावी अंधारांतिल अधीर धडधड मूक असाव्या सर्व पायर्‍या कठडाही सोशीक असावा अंगलगीच्या आधारास्तव चुकून कोठे पाय फसावा वळणावरती बळजोरीची वसुली अपुली द्यावी घ्यावी मात्र छतांतच सोय पाहुनी चुकचुकणारी पाल असावी जिना असावा असाच अंधार कधिं न कळावी त्याला चोरी जिना असावा मित्र इमानी कधिं न करावी चहाडखोरी मी तर म्हणतों-स्वर्गाच्याहि सोपानाला वळण असावें पृथीवरल्या आठवणींनी वळणावळणावरीं हसावें...! : वसंत बापट 

दिसं नकळत जाई ...

दिसं नकळत जाई सान्ज रेन्गाळुन राहि. क्शन एकहि न ज्याला, तुझि आठवन नाही. भेट तुझि ती पहिली लाख लाख आठवितो, रूप तुझे ते धुक्याचे कणा कणा साठवितो. ही वेळ सखी साजणी मज वेडावून जाई, दीसं नकळत जाई सान्ज रेन्गळून राहि.... असा भरून ये ऊर जसा वळीव भरवा अशी हूरहूर जसा गन्ध रानी पसरवा रान मनातले माझ्या मगं भिजुनिया जाई.. दिसं नकलत जाई सान्ज रेन्गाळुन राही आता अबोध मनाची  अनाकलनीय भाषा  जशा गूढ गूढ माझ्या  तळहातावर रेषा असे आभाळ असे आभाळ रोज पसरून राही दिसं नकलत जाई सान्ज रेन्गाळुन राही : सौमित्र 

तू ...

तू माझ्या आयुष्याची पहाट तू माझ्या कैफाची मत्त लाट तू मागिल जन्मांची आर्त साद तू मानस कुंजातील वेणूनाद तू माझ्या एकांताचा प्रकाश तू माझ्या गीतांचा बाहुपाश तू माज्या दु:खाची चांदरात तू माज्या स्वप्नांचा पारिजात तू अम्रुतभासांचा अंगराग तू विझल्या देहाचा दीपराग तू माज्या जगण्याची वाटचाल तू माज्या रक्ताचा रंग लाल तू माझ्या असण्याचा अंश अंश तू माज्या नसण्याच मधुर दंश :  सुरेश भट 

झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल...

जीव राखता राखता तुला हाताशी घेईन झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी तुझा पदर धरून मागे येईन उपाशी मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग नाही दु:खाचा आडोसा नको सुखाची चाहूल झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल : ग्रेस 

ही माझी प्रीत निराळी ...

ही माझी प्रीत निराळी संध्येचे शामल पाणी दु:खाच्या दंतकथेला डोहातून बुडवून आणी हाताने दान कराया पोकळीत भरला रंग तृष्णेचे तीर्थ उचलतो रतीरंगातील नि:संग शपथेवर मज आवडती गाईचे डोळे व्याकूळ घनगंभीर जलधीचेही असणार कुठेतरी मूळ आकाश भाकिते माझी नक्षत्र ओळ ही दंग देठास तोडतानाही रडले न फूलांचे अंग : ग्रेस 

काळ

आता आभाळानेही बरसताना थोडा विचार करायला हवा तस् मी स्वतःला सावरल तरी अजुन थोडा काळ सरायला हवा...

चंद्र

माझ्या तुझ्या मिठीला विसरून चंद्र गेला झाली पहाट तेव्हा वितळून चंद्र गेला ... नाही पुन्हा खुशीने आले भरून डोळे ओला रुमाल माझा हुन्गुन चंद्र गेला ...

गंध

माझ्या या शब्द्दफुलांना तसा तुझा गंध आहे गुम्फली माळ तुझ्यासाठी त्याला तुझ्याच गंध आहे...   post scrap cancel

नको नको रे पावसा ...

नको नको रे पावसा  असा अवेळी धिंगाणा  घर माझे चंद्रमौळी  आणि दारात सायली;   नको नाचूं तडातडा  असा कौलारावरुन,  तांबेसतेलीपातेलीं  आणू भांडी मी कोठून?   नको करु झोंबाझोंबी  माझी नाजूक वेलण,  नको टाकू फुलमाळ  अशी मातीत लोटून;   आडदांडा नको येउं  झेपावत दारांतून,  माझे नेसूचे जुनेर  नको टांकू भिजवून;   किती सोसले मी तुझे  माझे एवढे ऐक ना,  वाटेवरी माझा सखा  त्याला माघारी आण ना;  वेशीपुढे आठ कोस  जा रे आडवा धावत,  विजेबा, कडाडून  मागे फिरव पंथस्थ;   आणि पावसा राजसा  नीट आण सांभाळून,  घाल कितीही धिंगाणा  मग मुळी न बोलेन;  पितळेची लोटीवाटी  तुझ्यासाठी मी मांडीन,  माझ्या सख्याच्या डोळ्यांत  तुझ्या विजेला पूजीन;   नको नको रे पावसा  असा अवेळी धिंगाणा  घर माझे चंद्रमौळी  आणि दारात सायली.... : इंदिरा संत 

किती तरी दिवसात...

किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो किती तरी दिवसांत नाही नदीत डुंबलो खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच. केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाऊन निर्भय गावाकडच्या नदीत होऊन मी जलमय. आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी. बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पा-याचा बरी तोतया नळाची शिरी धार मुखी ऋचा : बा. सि  मर्ढेकर 

पाउस अवखळ...

क्षणात सरसर, धावे धरिवर... खट्याळ कोमल, वारा भरभर.. नभी पसरली, सुंदर झालर... मेघांमागे, दडला भास्कर... पाऊस अवखळ, वेड्या तालावर.... बागडतो हा, चराचरावर... मनही माझे, पडले बाहेर... गारा घेउन, तळहातावर... चोहिकडे हे, पाणीच पाणी... सुरात बेसुर, ओठी गाणी... चैत्राच्या ह्या उष्ण दुपारी... अवनी हरली, त्या जलधारांनी... सळसळ करती, झाडे झुरली... नेसुन उन्हाची, साडी पिवळी... थरथरला तो, मातीवरती... सुवास ओला, हळुच विखुरती... इन्द्रधनुच्या पंखावरती... 'मेघांच्या' त्या, सुंदर पंक्ती... मना-मनाच्या, हर्ष-कळ्यांची... खुलली गाणी, अन संध्या वरती...

रानात श्रावणात...

रानात श्रावणात बरसून मेघ गेला देहात नि मनात लावून आस गेला ... रानात श्रावणात दिसतात रंग ओले किलबिल पाखरांत तरू तृप्त वाकलेले ... रानात श्रावणात दाटी नव्या तृणांची मधु दाटल्या फुलांत आरास भ्रमरांची ... रानात श्रावणात आवाज निर्झरांचे खडकाळ डोंगरात चैतन्य जीवनाचे ... रानात श्रावणात फुलली अनेक नाती कुणी पाहिले न हात घडवून ज्यांस जाती ...

एकटी...

मी एकटीच माझी असते कधीकधी गर्दित भोवतीच्या नसते कधीकधी येथे न ओलखीचे कोणीच राहिले होतात भास् मजला नुसते कधीकधी जपते मनात माझा एकेक हुंदका लपवित आसवे मी हसते कधीकधी मागेच मी कधीची हरपून बैसले आता नकोनकोशी दिसते कधीकधी जखमा बुजुन गेल्या साऱ्या जुन्या तरी उसवित जीवनाला बसते कधीकधी... एल्गार - सुरेश भट

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं...

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ! काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात? काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे ! तरीसुद्धा, तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ! मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं; उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं; व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं; कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं ! सोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात ! आठवतं ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती होडी सगळी पाण्याने भरली होती ! लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो ! बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं, प्रेमानेच अलगद वर काढलं असतं ! तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं ! कारण, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ! प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात, प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात ! असाच एक जण चक्क मला म्हणाला, पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !

झंझावात...

जगलो असाच कसातरी ओठातल्या ओठात मी आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी झाले कशाचे बोलणे? केले जरा मन मोकळे ! जे राहिले सांगायचे ते टाळले अजिबात मी माहीतही नाही मला आलो इथे केव्हा कसा मीही अताशा एकतो ..... दिसलो म्हणे इतक्यात मी बसुनी गळेकापूंसवे मी काल मैफल जिंकली कटला जरी होता गळा उठलो अचानक गात मी कुठल्याच दारी मी कधी नेली न कागाळी तुझी नाराज आयुष्या तुझी घालू कशी रुजुवात मी ? तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे तुमच्यात मी येऊ कसा ? बदनाम झंझावात मी ! मजला असे पाहू नका .... रस्त्यावरी थांबू नका - धुंडाळतो आहे इथे माझा रिकामा हात मी ! माझ्या भविष्याची मला नाही जराही काळजी उमटेल मी धरतीवरी ..... चमकेन त्या गगनात मी !   एल्गार   -   सुरेश भट